Friday, May 22, 2020

ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाची ७५ वर्षे


🌳 *वारली आदिवासींच्या ऐतिहासिक उठावाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करू या!*
*२३ मे १९४५ ते २३ मे २०२०* 🌳

✊ ७५ वर्षांपूर्वी, ७ जानेवारी १९४५ रोजी ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथे झालेल्या पहिल्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य किसान सभेची स्थापना झाली. तलासरीचे माह्या धांगडा व इतर १४ आदिवासी प्रतिनिधींनी, जमीनदार-सावकारांनी त्यांच्यावर वर्षांनुवर्षे लादलेली वेठबिगारी, लग्नगडी पद्धत, बेसुमार लूट व अनन्वित अत्याचारांची संतापजनक परिस्थिती या अधिवेशनात मांडली. 

✊ २३ मे १९४५ रोजी तलासरी तालुक्यात झरी या गावी डहाणू व तलासरी तालुक्यांतील ५,००० आदिवासी स्त्री-पुरुष जमले. कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली ही सभा बोलावली गेली. कॉ. शामराव परुळेकर आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांनी वेठबिगारी व लग्नगडी पद्धत नष्ट करण्याची हाक दिली. आणि देशभर गाजलेल्या अभूतपूर्व वारली आदिवासी उठावाची सुरुवात झाली. 

✊ लाल बावट्याखाली झालेल्या आदिवासींच्या बुलंद एकजुटीतून, त्यागातून आणि संघर्षातून रानटी वेठबिगारी आणि लग्नगडी पद्धत काही महिन्यातच नष्ट करण्यात आली. मजुरीवाढीच्या व वनाधिकाराच्या, जमिनीच्या, पाण्याच्या, अन्नाच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या व आरोग्याच्या हक्काच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना आदिवासी उठावाने पुढे यशस्वीरीत्या हात घातला. ह्या प्रश्नांवरील लढे राज्यभर आणि देशभर सुरू आहेत आणि ते वाढणार आहेत.

✊ पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू पासून जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांपर्यंत, आणि नंतर नाशिक, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, नांदेड, यवतमाळ व इतर आदिवासीबहुल जिल्ह्यांपर्यंत लाल बावट्याची तेजस्वी चळवळ पसरली आणि वाढत गेली. 

✊ जेठ्या गांगड पासून ते लक्ष्या बीज, बाबू खरपडे, मथी ओझरे व प्रदीप धोदडेपर्यंत ठाणे-पालघर जिल्ह्यातील ६१ आदिवासी हुतात्म्यांना ब्रिटिश, काँग्रेस आणि भाजप सरकारांच्या पोलिसांच्या व गुंडांच्या पाशवी दडपशाहीमुळे वीरमरण आले. नाशिक जिल्ह्यातील लक्ष्मण बागुल याच्यासह ३ हुतात्मे धारातीर्थी पडले.

✊ गेली ७५ वर्षे चार पिढ्यांतील लाखों लोकांच्या संघर्षांतून, प्रबोधनातून आणि संघटनेतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तसेच किसान सभा, सीटू, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांची चळवळ अनेक ज्वलंत प्रश्नांवर अविरत सुरूच आहे. इतर सर्व पुरोगामी, जनवादी व धर्मनिरपेक्ष शक्तींना आपण सोबत घेऊ या! शोषणमुक्त समाजासाठीचा आपला संघर्ष आपण जास्त व्यापक, तीव्र व बुलंद करू या!

 *या ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा झालाच पाहिजे.* 

त्यासाठी

👉 *येत्या २३ मे रोजी प्रत्येक गावात, पाड्यात आणि घरावर लाल बावटे अभिमानाने फडकवू या!* 

👉 *कॉ. शामराव परुळेकर, कॉ. गोदावरी परुळेकर, कॉ. नाना मालुसरे, कॉ. कृष्णा खोपकर, कॉ. के. के. पवार, आपले असंख्य दिवंगत आदिवासी योद्धे आणि आपले ६४ हुतात्मे यांचे विनम्र स्मरण करू या!* 

👉 *कोरोना काळात पुन्हा एकदा अत्यंत हृदयशून्य, श्रमिकविरोधी, धनिकधार्जिणे, धर्मांध आणि भ्रष्ट ठरलेल्या भाजपच्या मोदी-शहा सरकारविरुद्ध आणि श्रमिकांच्या ज्वलंत मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या देशव्यापी हाकेनुसार २७ मे रोजी शारीरिक अंतर पाळून गावागावात जोरदार निदर्शने करू या!*

 *आपलेच* 

🌱 *डॉ. अशोक ढवळे* 
🌱 *जे. पी. गावीत* 
🌱 *किसन गुजर* 
🌱 *बारक्या मांगात* 
🌱 *अर्जुन आडे* 
🌱 *डॉ. अजित नवले*